अजिंठा पायथ्याशी फर्दापूर येथे २० वी धम्म परिषद उत्साहात पार कोरिया व भारतातील बौद्ध भिक्षूंची उपस्थिती, धम्म संदेशाने निनादले धम्माचल!

अहमदपूर प्रतिनिधी /
लातूर जिल्ह्याचे सुपुत्र धम्म परिषदेचे अध्यक्ष फर्दापूर तालुका सिल्लोड
अजिंठा लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या पवित्र धम्माचल, फर्दापूर येथे आज भव्य २० वी धम्म परिषद मोठ्या उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडली. या ऐतिहासिक धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड (IAS) हे होते.
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतासोबतच दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित बौद्ध नेत्यांची विशेष उपस्थिती. साउथ कोरिया चे गव्हर्नर किम दु क्वान तसेच कोरियन बुद्धिस्ट मास्टर भंतेजी ली चांग बे आणि त्यांचा भिक्खू संघ हे विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय उपस्थितीमुळे धम्म परिषदेचे स्वरूप अधिक भव्य आणि जागतिक बनले.
यावेळी सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार, लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड, डॉ. एस. पी. गायकवाड, डॉ. उपगुप्त महाथेरो, दत्ता गवळे, प्रा. रामेश्वर बद्दर, अधीक्षक अभियंता श्रीमती गायकवाड, विलास कांबळे, चेतन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण पंचशील ग्रहणानंतर भिक्खू संघाच्या मंगलपाठाने वातावरण पवित्र झाले. त्यानंतर धम्म उपदेश, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बौद्ध विचारांचे प्रबोधन असे विविध सत्रे पार पडली.
डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,
“धम्माचल हे केवळ धार्मिक केंद्र नाही, तर जागतिक शांतता, करुणा आणि मैत्रीचा प्रसार करणारे एक प्रेरणास्थान आहे. अजिंठा लेणीच्या वारशाशी जोडलेली ही धम्म परिषद भविष्यात आंतरराष्ट्रीय धम्म संवादाचे केंद्र बनेल.”
गव्हर्नर किम दु क्वान यांनी बौद्ध धम्माच्या जागतिक एकतेचा संदेश देत भारतीय बौद्ध परंपरेचे कौतुक केले, तर मास्टर ली चांग बे यांनी भारतातील बौद्ध वारशाशी सखोल आध्यात्मिक संबंध अधोरेखित केले.
या परिषदेला महाराष्ट्रभरातून तसेच देशभरातून हजारो बौद्ध उपासक-उपासिका, युवक-युवती आणि बौद्ध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संपूर्ण परिसर ‘जयभीम’च्या घोषणांनी आणि धम्म वंदनांनी निनादत होता.
परिषदेचा समारोप भिक्खू संघाच्या आशीर्वचनांनी झाला. आयोजक समितीने सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि पुढील वर्षी आणखी भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा केली.



