कालवश उत्तमराव पंडित यांच्या स्मृतीप्रित्यार्थ संवेदना गौरव पुरस्कार सोहळा हिमायतनगर येथे थाटात संपन्न दिग्गज साहित्यिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संवेदना गौरव पुरस्काराने सन्मान

विष्णु जाधव हिमायतनगर /-
संवेदना फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तसेच स्मृतिशेष का. उत्तमराव पंडित यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हिमायतनगर येथे ” संवेदना गौरव पुरस्कार ” देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम का. उत्तमराव पंडित यांच्या द्वितीय पुण्यानुमोदन निमित्त आयोजित करण्यात आला होता.
साहित्य क्षेत्रातील साहित्यिकांचे प्रस्ताव मागवून त्यांच्या साहित्यकृतीचे समीक्षण करून पुरस्कार निवड करण्यात आली. यात सर्वोत्कृष्ठ गझलसंग्रह म्हणून ” भुकेचा केंद्रबिंदू ” या सुप्रसिद्ध गझलकार गजानन दादा वाघमारे यांच्या गझलसंग्रहास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच उत्कृष्ट गझल संग्रह म्हणून ” समतेच्या डोहाकाठी ” या गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र ) यांच्या गझलसंग्रहास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह म्हणून ” बापाची कविता ” या सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांच्या कवितासंग्रहास सन्मानित करण्यात आले.सर्वोत्कृष्ट प्रातिनिधिक कवितासंग्रह म्हणून ” काव्यधारा ” चे संपादक या प्राध्यापक प्रकाश वाकळे यांना सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून ” देवी रक्षति रक्षितः ” या लेखिका सौ सारिका कंदलगांवकर यांच्या कादंबरीस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कथासंग्रह म्हणून लेखिका रोहिणी पांडे यांच्या ” तिच्या खिडकीतलं आभाळ ” या कथासंग्रहास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट ललित लेखन म्हणून लेखिका निशा डांगे यांच्या ” कपाळगोंदण ” यास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर कृषीतज्ञ,कृषीलेखक म्हणून प्रसिद्ध असलेले सचिन होळकर यांच्या ” शेती शोध आणि बोध ” या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह म्हणून सन्मानित करण्यात आले.तसेच साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल गझलकार डॉ. स्वाती भद्रे, गझलकार सतीश देशमुख व विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा गझलकार विजय धोबे यांनाही संवेदना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचाही सन्मान यावेळी पुरस्कार देऊन करण्यात आला. यात ज्येष्ठ पत्रकार गंगाधर वाघमारे यांना ” उत्कृष्ट पत्रकारिता ” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे यांना ” उत्कृष्ट पत्रकारिता ” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दैनिक एकमतचे पत्रकार नागेश शिंदे यांना ” उत्कृष्ट पत्रकारिता ” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व उत्कृष्ट लिखाण करणारे पत्रकार दाऊ गाडगेवाड,विष्णू जाधव व विजय वाठोरे सरसमकर यांचाही ” उत्कृष्ट पत्रकारिता ” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विजयकुमार पंडित यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत सातत्याने रुग्ण सेवा करणारे डॉ. मारोती वाकोडे यांना” संवेदना गौरव पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संवेदना फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते.सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रमेश उत्तमराव पंडित, रोहित उत्तमराव पंडित यांनी त्यांचे वडील कालवश उत्तमराव पंडित यांच्या स्मृतिप्रित्यार्थ केले होते. या पुरस्कार वितरण सोहळ्यास अनेक दिग्गज साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



