आंदेगावची स्मशानभुमी तीन दशकांपासून अतिक्रपाणाखाली ,
प्रशासनाकडे अर्ज करूनही स्मशानभुमीची जागा मिळेना
हिमायतनगर/ विष्णु जाधव
माणसाला माणुस म्हणुन जीवन जगताना सर्व सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जीवंतपणी सामान्य नागरीकांना जीवनभर संघर्ष करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. सहजा सहजी काही मिळत नाही. अन्न, वस्त्र,
निवाऱ्यासाठी रात्रदिवस मेहनत करावी लागते , तेव्हा कुठे पोट भरते त्यातही कधी कधी अपमानही सहन करावा लागतो. जीवंतपणी तर नरक यातना सहन कराव्या लागतात. पण मृत्युनंतरही त्या माणसाच्या पार्थिव देहाची विटंबना होत असेल तर येथील शासनकर्त्यांच अपयश म्हणाव लागेल. अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात उघडकीस आली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथील स्मशानभुमीची जागा काही लोकांनी अतिक्रमण करून बळकावली असून मागील तीन दशकांपासून येथील नागरीकांना पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची जागा मिळत नाही. यासाठी येथील नागरीकांना स्मशान भुमिची जागा मोकळी करून देण्यात यावी अशा आशयाचे प्रशासनाकडे अर्ज केले. परंतु भुमि अभिलेख विभागाकडून तीन वेळा केवळ जागेची पाहणी करण्यात आली परंतु अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची जागा दिली नाही. आंदेगाव येथील नागरीकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्या कुटुंबाने हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा दिली, आज त्याच कुटुंबाला व गावकऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी हक्काची जागा मिळत नसून बेवारस जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहे. यामुळे येथील नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व तहसिलदार या प्रकरणामध्ये ठोस भुमिका घेऊन येथील नागरीकांना स्मशानभुमि अतिक्रमणातून केव्हा मोकळी करून देणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष्य लागले आहे.



