पवना येथील निकृष्ट कामाची व खोट्या ग्रामसभांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा
लोकशाही मुल्ल्यांचा भंग केला असल्याची युवकांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार

विष्णु जाधव /- हिमायतनगर
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या कामा संदर्भात एकामागे एक तक्रारी येतच आहेत. पण हिमायतनगर येथील पंचायत समीतीचे गकविकास अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नसल्याने तालुक्यातील ग्रामपंचायतीने केलेल्या निकृष्ट कामाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे करावी लागत आहे. अशीच एक तक्रार पवना येथील युवकांनी केली आहे.
सविस्तर माहीतीनुसार, तालुक्यातील पवना गावामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे कामे करून त्यात मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून जी कामे केली आहेत त्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तसेच नाली, रस्ता, शाळेची इमारत, आरोग्य उपकेंद्र ईत्यादी कामाचे बांधकाम व दुरूस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असे म्हटले आहे. तसेच ग्रामसभा देखील बोगस दाखवण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
असे अनेक कामे निकृष्ट दर्जाची, अपुर्ण व गैरव्यवहार झाल्याची साक्ष देणारी आहे. ग्रामस्थांनी यावर वारंवार आक्षेप घेऊनही ग्रामसेवक, सरपंच यांनी कोणतीही दखल घेतली नाही. शासनाकडून आलेला निधी योग्य प्रकारे वापरण्या ऐवजी कागदोपत्री तयार करून जनतेच्या पैशाचा उघडपणे अपहार करण्यात आलेला आहे. याशिवाय गावातील ग्रामसभा न चेता खोटी ग्रामसभा दाखविली जाते. त्यासाठी बनावट छायाचित्र, कागदपत्र तयार करून शासनाला दाखवले आहेत. हा प्रकार भारतीय राज्यघटनेतील लोकशाही मुल्यांचा व ग्रामपंचायत कायद्याचा सरळसरळ भंग असल्याचे म्हटले आहे.

यामुळे गावातील नागरीकांसह विशेषता: युवक वर्गामध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. गावच्या विकासासाठी आलेला निधी फसवला गेला असल्याचा आरोपही युवकांनी केला आहे. उच्चस्तरीय समीती नेमून बोगस कामांची सखोल, निष्पक्ष चौकशी करून ग्रामसेवक, सरपंच व संबंधीत ठेकेदारावर कठोर कार्यवाही करण्यात यानी. तसेच असा प्रकार यापुढे कोणत्याही ग्रामपंचयतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडून होणार नाही यांची दक्षता प्रशासनाने करावी अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यात येईल असा इशारा अमोल राऊत, प्रताप अक्कमवाड, अनिकेत राऊत, महेश जाधव, नागनाथ आंबेपवाड, भोजन्ना तमलवाड, ज्ञानेश्वर कुस्तपवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.



