ग्रामसेवकाच्या निष्क्रिय कारभारामुळे पळसपुर येथील नागरीक त्रस्त

हिमायतनगर / विष्णु जाधव
पळसपूर येथील ग्रामसेवक शिरारपल्लू यांच्या निष्क्रिय कारभारामुळे पळसपूर गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गावातील मूलभूत सुविधा व प्रशासकीय कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या जन्म व मृत्यू नोंदीसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे फेरे मारावे लागत असून, संबंधित कामे मुद्दाम टाळाटाळ करून प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच जागेच्या फेरफारसंबंधित अनेक अर्ज महिनोमहिने प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
याशिवाय गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.
दरम्यान, ग्रामसेवक शिरारपल्लू हे मोबाईल बंद ठेवून नांदेड येथे वास्तव्यास असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे तक्रारी मांडण्यासाठी व कामांचा पाठपुरावा करण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गावात स्वच्छतेचा अभावही गंभीर बनला असून, ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी डासांची संख्या वाढली असून, नागरिकांना विविध साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.



